गप्पा टप्पा (अजय- अतुल)
गप्पा टप्पा (अजय-अतुल)
(1)

मुळ गाव?
   -जन्म पुणे येथे झाला. अतुल थोरला भाऊ आणि मी (अजय) दोन वर्षांनी लहान. आम्ही दोनच भाऊ (सख्खे)

आई वडिलांची पार्श्वभूमी
   -आई वडील अत्यंत गरीब परिस्थितीत होते. आमचीही तशीच होती. वडीलांना चार भाऊ तीन बहिणी. शिक्षणाचा फार ओढा घरात नव्हता. पण सर्वांमध्ये वडीलच शिकले. ग्रज्युएट झाले (शिक्षणाची जाण असल्यामुळे). नंतर सरकारी नोकरी स्वीकारली. वडिलांच्या लहानपणी ते आपल्या भावंडांबरोबर व चुलत भावंडांबरोबर लिंबू, मिरची, कोथिंबीर अशा वस्तू विकून घर चालविण्यास हातभार लावत असत. वडिलांचा एक भाऊ (थोरला) शाळेत जाऊन आला की मग वडील त्याचा शर्ट घालून शाळेत जायचे. अशी त्यांची मूळ परिस्थिती. आईच्या माहेरीपण प्रचंड गरीबी. आजोळी शेती हाच व्यवसाय असला तरी त्यात फार उत्पन्न होत नसे. आमचे मामा, आले पाकाच्या वडय़ा विकून घर चालवीत असत.

शालेय शिक्षण कुठपर्यंत झालायं?
   -अतुलने वकिली म्हणजेच लॉ चे शिक्षण अर्धवट सोडले. तर मी बॉ. कॉम. चे शिक्षण अर्धवट सोडले. आयुष्यात संगीतात करीयर करायचे निश्चित असल्यामुळे. सांगितिक क्षेत्रात संधी मिळत गेल्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले. संधी मिळाल्यानंतर काम स्विकारत गेलो, त्यातून थोडेफार पैसे मिळत असे (त्याची गरजही होती).

संगीत या क्षेत्राशी कधी संबंध आला?
   -संगीत क्षेत्राची सुरुवात मी (अजय) कोरसमध्ये गाऊन केली आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे. दुसरीत तिसरीत असताना शाळेतल्या कवितांना चाली लावत होतो, पण चाल लावणे म्हणजेच संगीत देणं/संगीतकार होणे हे आम्हाला माहित नव्हते.

संगीत दिग्दर्शन करायचे कधी ठरवले?
   -संगीतच करायचं हे लहानपणीच पक्के ठरविले होते.

आई वडिलांची प्रतिक्रिया काय होती?
   -आई वडीलांचा संगीत व्यवसायासाठी पुर्ण पाठिंबा होता, परंतु आपल्याकडे घरात एक पद्धत असते ज्यानुसार मुलांची वयं 17 ते 20 वर्षे असताना ते नोकरी करत नाहीत, हे मात्र आम्हाला ऐकावे लागत असे, पण कालांतराने ते कमी झाले. कामं मिळत गेल्याने त्यांचाही आत्मविश्वास वाढत गेला आणि त्यानंतर आजतागायत आम्हाला भरपूर पाठिंबा दिला. संगीत देणं हे काम मनापासून करा आणि केवळ पैसे मिळणार म्हणून वाट्टेल ते काम स्वीकारू नका; असा सल्ला वडीलांनी दिला.

लहानपणाच्या आठवणी
   -शाळेत असताना खूप कवितांना चाली दिल्या. साने गुरुजींची ‘देह मंदिर चित्र मंदिर एक तेथे प्रार्थना’, ‘टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले’, ‘या बाळांनो या रे या’. एक महत्त्वाची आठवण म्हणजे आम्ही शिरुरला असताना आमच्याकडे एक टेप रेकॉर्डर आणला आणि एकच कॅसेट आणली, बाबासाहेब देशमुखांचा पोवाडा. तो अतुलला पाठ झाला आणि मग शिरुरमध्ये कोणत्याही कार्यक्रमाला त्याला तो सादर करण्यास बोलवत असे, त्याला सर्व ‘बाल शाहीर’ म्हणू लागले. त्यामुळे शाळेत प्रार्थनेपासून ते कोणत्याही सांस्कृति कार्यक्रमांपर्यंत अगदी गॅदरींगसुध्दा सर्वच गोष्टींमध्ये आम्ही असायचो. महत्त्वाची आठवण म्हणजे शिरुरच्या विद्याधाम प्रशाला शाळेतून आम्ही जेव्हा राजगुरुनगरला महात्मा गांधी विद्यालय शाळेत गेलो तेव्हा त्या शिरुरच्या शाळेतील मुख्याध्यापकांनी राजगुरुनगरच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहिले की ‘‘आम्ही दोन हिरे तुमच्याकडे सुपुर्द करीत आहोत, त्यांचा योग्य सांभाळ करा, जोपासना करा’’ ही आमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट होती.

आपल्या मते अमिताभ मोठा की आर. डी. बर्मन?
   -नो कॉमेंट

आवडते संगीतकार कोणते?
   -तसे सगळेच, पण लहानपणी बप्पी लहरी. नंतर लक्ष्मीकांत प्यारेलाल आवडायला लागले. आता मोठे झाल्यानंतर कळले मदन मोहन, खळे, बाबूजी, राम कदम, विश्वनाथ मोरे, वसंत देसाई, वसंत पवार, श्रीधर फडके असे अनेक. पाश्चिमात्य ऐकायला लागल्यानंतर मोझार्ट, विवाल्डी, सॅम्युएल बार्बर, जेरी गोल्डस्मिथ, हल झिमर आणि जॉन विलीयम्स् खूप ऐकले. हिंदुस्थानी म्हणायचे तर आर.डी. आणि ईलाई राजांचा प्रचंड प्रभाव आमच्यावर आहे. ए.आर. रहमानला आम्ही मानतो.

कोणात्या संगीतकाराचा आपल्यावर सर्वात जास्त प्रभाव आहे?
   -जॉन विलीयम्स

संगीत दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट कोणता?
   -गायब (हिन्दी)

तुम्ही दिलेली हीट गाणी इतरांच्या आवाजात ऐकल्यावर ती आपण गायला पाहिजे होती, असे वाटते का?
   -आजिबात नाही

हिंदी चित्रपट संगीत व मराठी चित्रपट संगीत यात अधिक आव्हानात्मक काय वाटते?
   -संगीतात आव्हानात्मक नसतं, चित्रपटातली परिस्थिती कशी आहे आणि त्यानुसार संगीत द्यायचय हे आव्हान असतं.

आयुष्यात आलेले अपमानाचे, आनंदाचे तसेच रागाचे दोन तीन प्रसंग सांगा!
   -अपमान अनेकवेळा झाला. वाद्यांना हात लावू न देणं वगेरे. वाद्यांबद्दल आदर असूनसुध्दा असे अपमान अनेकवेळा झाले. आनंदाची गोष्ट एवढीच होती की आमच्या दोन्ही आज्यांच्या समोर बँड पथके होती त्यामुळे तिथे जाऊन ट्रम्पेट हातात घेणे, बेस ड्रम/ढोल वाजवायला मिळत असे.

एकमेकांपासून वेगळे होऊन काम करु शकाल का?
   -प्रश्नच येत नाही. कामच काय पण काहीच करु शकत नाही.

एकमेकांचे प्लस व माईनस पॉईंट सांगा.
   -अतुलचा प्लस प्वाईंट म्हणजे तो आग्रही आहे. आम्हाला जे पाहिजे ते तो कलाकारांकडून करवून घेतो. मी (अजय) संकोच करतो पण तो नाही. हा माझा माईनस प्वाईंट. अतुलचा माईनस प्वाईंट म्हणजे तो खुप लवकर रागावतो आणि मी फार रागवत नाही.