
जगण्याविषयी स्वत:च्या स्वतंत्र संकल्पना असलेली आजची पिढी एकत्र कुटुंबातून विभक्त कुटुंबात अधिक रममाण होताना दिसत आहे. आधुनिकीकरणाच्या आहारी जात कौटुंबिक जबाबदारी विसरलेल्या आजच्या युवा पिढीतील काही जणांना आपल्या जन्मदात्यांचाच विसर पडलेला दिसतो. त्याचवेळी दुसरीकडे सुखासीन आयुष्य जगत असूनही आई-वडिलांच्या मायेला पारखी असलेली पिढीसुद्धा पाहायला मिळत आहे. समाजातील हाच बदलता प्रवाह चित्रपटातून रेखाटण्याचा प्रयत्न ’आर. के. व्हिजन’ बॅनरच्या ’मान सन्मान’ चित्रपटातून करण्यात आला आहे.
राकेशकुमार मेहेता निर्मित, प्रविण राजा कारळे दिग्दर्शित ’मान सन्मान’ चित्रपटात समाजातील दुभंगलेल्या कुटुंबसंस्थेमुळे नातेसंबंधामध्ये आलेली पोकळी चित्रीत करण्यात आली आहे. प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या ’मान सन्मान’ चित्रपटात शिवाजी साटम, रिमा लागू, रेशम टिपणीस, यतिन कार्येकर, पंकज विष्णू, अविष्कार दारव्हेकर, मेघा घाटे, आशिष पवार यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
’मान सन्मान’ ची कथा के. इकबाल यांची असून पटकथा-संवाद शशांक केवले यांनी लिहिले आहेत. या चित्रपटातील भावस्पर्शी गीतांच्या ओळी अविनाश घोडके, डॉ. सुनंदा पालवणकर, सागर खेडेकर यांनी लिहिल्या असून त्यांना चिनार-महेश यांच्या संगीताची साथ लाभली आहे. रविंद्र साठे आणि गायिका साधना सरगम यांच्या सुरेल आवाजात ती स्वरबद्ध करण्यात आली आहे. याशिवाय हिंदीतील ’रेस’ चित्रपटातील गाण्यातून नावारुपाला अलेली गायिका सुजेन आणि ’चिनीकम...’ या गाण्यातून लोकप्रिय ठरलेला गायक विजय प्रकाश हे सुद्धा या मराठी चित्रपटासाठी गायले आहेत.
’आर. के व्हिजन’च्या ’मान सन्मान’ चित्रपटाचे प्रॉडक्शन डिझायनर म्हणून एम. एस. साळवी काम पाहत असून संकलन सनील कोकाटे करीत आहेत. या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी भरत वोरा, राजेंद्र माणीक सांभाळीत असून छायाचित्रण अनिकेत खंडागळे यांनी केले आहे. कला दिग्दर्शन मनोहर आचरेकर यांचे असून ध्वनी संयोजन प्रकाश निकम यांचे आहे. ’मान सन्मान’ च्या निर्मिती प्रबंधकाची भूमिका विनय नलावडे पार पाडीत आहेत.
उत्तम कथानक, दमदार स्टारकास्ट असलेला ’मान सन्मान’ प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहे.