‘स्वराज्य...मराठी पाऊल पडते पुढे’ ह्या टिमशी साधलेला संवाद...!
चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी निरनिराळे फंडे निर्माता - दिग्दर्शकाकडून नेहमीच लढविले जातात. आकर्षक जाहिराती, पोस्टर, होर्डीग, फेसबुक, ध्वनीफित, मोबाईल कॉलर टयून्स सारख्या अनेक माध्यमांतून चित्रपटाची जोरदार पब्लिसीटी करण्यात येते. आजवर एखाद्या मराठी चित्रपटाचे एवढे मोठे कटआउट उभारण्याची ही पहीलीच वेळ आहे. ४० फुटाची मजल मारुन मराठी चित्रपटाचे प्रसिद्धीचे एक पाऊल पुढे टाकले आहे ते सध्या चर्चेत असलेल्या ‘स्वराज्य...मराठी पाऊल पडते पुढे’ ह्या चित्रपटाने.‘स्वराज्य...मराठी पाऊल पडते पुढे’ ह्या चित्रपटाची टिम पुण्यात आली असता त्यावेळी साधलेला संवाद...!
दिग्दर्शक विशाल- ‘स्वराज्य...मराठी पाऊल पडते पुढे’ या नावाचा अर्थ असा, ‘मराठी माणसानी मराठी माणसांसाठी एकत्र येऊन तयार केलेल स्वत:चं राज्य म्हणजे स्वराज्य होय’.
मुख्य म्हणजे हा चित्रपट मराठी माणसावर आहे. अर्थातच त्यात अमराठी, परप्रांतीय माणुस आला, असं यात नाही. कारण मराठी माणुस आणि त्याचं कर्तुत्व एवढं महान आहे की तो आपलं कर्तुत्व एवढया चागंल्या प्रकारे दाखवू शकतो की त्यासाठी दुस-याचा उल्लेख करण्याची आवश्यकताच नाही. तसेच या चित्रपटात जात-धर्म असा कोणताही वाद नाही. एक मराठी माणुस आपल्या आजुबाजुच्या लोकानां एकत्र करुन समाजाचं कसं भलं करता येईल आणि हे करतांना इतर धर्मीयांनासोबत घेऊन काम करतो. हा आम्ही संदेश दिला आहे.
मला एक सांगावसे वाटते, समीक्षक म्हणजे प्रेक्षकाचं मत सांगणारा व्यक्ती. हे सर्व लक्षात घेऊन आम्ही या चित्रपटाच्या कथेवर बरच काम केलं. प्रत्येक गोष्ट पुन्हा पुन्हा अनुभवली/अभ्यासली आणि मग त्यात बदल केले. ही संपूर्ण कथा विहारने लिहिली. कथा-पटकथा-संवाद-गीते-नृत्य दिग्दर्शन अत्यंत योग्य त-हेने लिहिली आहेत. चित्रपट बघितल्यावर तुम्ही देखील असचं म्हणाल!
दिग्दर्शक विहार - ‘स्वराज्य...मराठी पाऊल पडते पुढे’ हा असा सिनेमा आम्ही बनवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘या फिल्म मध्ये जी काही पात्र आहेत ती सर्व कॅरेक्टर आपल्या समाजातील जितक्या व्यक्ती तितक्या वल्ली, स्वभाव, ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यातलच एक कॅरेक्टर म्हणजे राम पाठारे यांची भूमिका अभिनेता राजेश शॄंगारपूरे याने केली आहे. या चित्रपटात सहा गाणी आहेत आणि त्या गाण्यांच्या माध्यमातून आम्ही ओरिजनल वाद्य-वॄंदाचा वापर केला आहे, हे विशेष! यात आपल्या मराठी शौर्याचा इतिहास एका गाण्याच्या माध्यमातुन दाखवला आहे. राजेशने यासाठी आवश्यक ते सिक्स पॅक बनवले ही बाब महत्वाची आहे.
राजेश शॄंगारपूरे- ह्या चित्रपटात मी जी भूमिका साकारली आहे ती माझ्या आज पर्यंतच्या करिअर मधील मला सर्वात जास्त आवडलेली भूमिका आहे. मला अॅक्शन जॉनर भूमिका फार आवडतात. राम पाठारे हा सकारात्मक वाटचाल करणारं एक कॅरेक्टर आहे. यात ‘मॅन टू मॅन फाईट’ आहे. ते मला फार आवडले.
अंशुमन विचारे- ह्या चित्रपटात मी शाम ची भूमिका साकारली आहे. नेहमी मी विनोदी भूमिका करतो पण यात मी एका वेगळ्या व्यक्तीरेखामध्ये दिसणार आहे. ह्या चित्रपटात एक मसाला आहे. ह्यात मुख्य म्हणजे दहीहंडीचं गाणं आहे. ते माझं आहे.
दिग्दर्शक विशाल- आणि ही दहीहंडी त्याने कोणतीही कृत्रिम मदत न घेता नैसर्गीकरीत्या फोडली. ही बाब फार कौतुकास्पद आहे.
नम्रता गायकवाड - हा माझा पहिला चित्रपट असुन मी ह्यात मीरा मालवणकर ची भूमिका बजावली आहे. ह्या चित्रपटामध्ये माझी मराठी मध्यम वर्गीय घरातील साधी/सोज्वळ भुमिका असून लग्न झाल्यानतंर ती नव-याच्या पाठीमागे न उभी राहता त्याचा सोबत खादंयाला खांदा लावून उभी राहते. माझं यात राजेश सोबत सुंदर गाणं आहे जे साधना सरगम यांनी गायलं आहे. ह्या गाण्याचं शुटीग तुळजापूर, लोणावळा या ठिकाणी झालं.
सुश्रृत मंकणी - मी यात रहीम शेख ची भूमिका साकारली आहे. माझं त्यात गुंडं/मवाली चं कॅरेक्टर आहे. पण नंतर राम पाठारे मुळे त्याच्या स्वभावात कसं परिवर्तन होतं व मग तो चांगला कसा होतो. अशी काहीशी ही भूमिका आहे.
दिग्दर्शक विशाल - मराठी माणसानेच या चित्रपटाची सुरुवात होते आणि शेवट ही मराठी माणसानेच होतो. या चित्रपटात सहा गाणी आहेत मात्र ती कथेची गरज/भाग म्हणून आली आहेत. या चित्रपटात राजकारणाचा कुठेही संबंध नाही व हा सिनेमा कोणत्याही पक्षाच्या कुठल्याही व्यक्तीवरही भाष्य करत नाही. ह्या चित्रपटाचे निर्माते सादुक लष्करीया यांच्या प्रोडक्शनचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटासाठी त्यांनी पाच ते सहा कोटी रुपये खर्च केला असून, हा चित्रपट ११/११/२०११ या तारखेच्या खास मुहूर्तावर १५० थिएटर मध्ये एकाच वेळी प्रदर्शित होत आहे.