|
श्री. प्रल्हाद जाधव हे महाराष्ट्र शासनाचे उच्चस्तरीय प्रसिध्दी अधिकारी. मंत्रालयातील आपले काम ते चोख करतातच पण अनेक मराठी वृत्तपत्रात माहितीपूर्ण व चटकदार स्तंभलेखन ते करतात. इतकेच नव्हे तर ते प्रतिवर्षी एक नवे नाटक लिहितात आणि स्पर्धांत पारितोषिके मिळवितात. हे सारं करण्यासाठी ते वेळ व जोम कुठून आणतात कुणास ठाऊक. त्यांचं सर्व लेखन वाचनीय असतं, त्यात काहीतरी विशेष सांगितलेलं असतं. त्यांचा परिचय झाला राज्य नाटयस्पर्धेतील “शेवंता जीती हाय” या जबरदस्त पकड घेणार्या नाटकामुळे. एकही स्त्री पात्र
नसलेलं हे नाटक ग्रामीण पुढार्याचा भ्रष्टाचार उघडकीस आणते. त्यातील लेखनांमुळं आणि कलाकरांच्या भुमिकेमुळे ते नाटक राज्य नाटयस्पर्धेत अंतिम स्पर्धेसाठी आम्हा परीक्षकांना आणावे लागले. या नाटकाला अनेक स्पर्धांत पारितोषिके मिळाली. राज्य नाटयस्पर्धेत नविन नाटकांचाच अंतर्भाव झाल्यानंतर श्री. जाधव यांनी प्रतिवर्षी नवीन नाटकं स्पर्धेसाठी लिहिली. त्यातील काहींना परितोषिकेही मिळाली. त्यांच्या सर्वच नाटकांचे वेगवेगळे होते. असे वेगवेगळे विषय ते कुठून शोधून काढतात कुणास ठाऊक! व्यवसायिक रंगभुमीवर त्यांनी दोन तीन नाटके करुन पाहिली. ती रंजक होती पण त्यांचा विषय सर्वसामान्य प्रेक्षकांना पसंत पडणारा नव्हता म्हणून त्यांना यश मिळालं नाही. त्यांनी अनेक नविन नाटकं विविध विषयावर लिहिली आणि ती व्यवसायिक रंगभुमीवर यावी म्हणून प्रयत्न केला. पण नाटकं वर्षानुवर्षे कुजवून ठेवण्याच्या मराठी निर्मात्याच्या धोरणामुळं त्यांच्याकडे ती तशीच पडून राहिली. सध्या प्रेक्षकांच्या अभिरुचीत बदल झालेला दिसतो म्हणूनच की काय ‘माकड आणि शॅम्पेन, कबड्डी कबड्डी, यू टर्न, व्हाईट लीली ऍन्ड नाईट रायडर ही समांतर रंगभुमीवरील नाटकं व्यवसायिक रंगभुमीवर येऊन यशस्वी झाली आहेत. तशीच नाटयस्पर्धेत गाजलेली नाटकेही व्यवसायिक रंगभुमीवर यश मिळवू शकली आहेत. प्रल्हाद जाधव यांचं “विठू माझा लेकुरवाळा” हे नाटयस्पर्धेत गाजलेली नाटक आता “कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या” या नावानं व्यवसायिक रंगभुमीवर आलं आहे. त्यालाही प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. मी हे नाटक ५-६ वर्षापूर्वीच वाचलं होतं, आणि मला ते आवडलंही होतं, पण मी ते व्यवसायिक रंगभुमीवर यावं म्हणून प्रयत्न करुनही ते जमलं नाही. पण व्यवसायिक रंगभुमीवरील अनेक नाटकांचे यशस्वी दिग्दर्शक मंगेश कदम यांनी ते वाचलं आणि त्यांना ते व्यवसायिक रंगभुमीवर करावंसं वाटलं. त्यावर त्या दॄष्टीने काम करून त्यांनी ते स्मिता तळवलकर यांना वाचायाला दिलं. त्यांनाही ते आवडलं आणि मग त्यांनी ती भुमिका स्वीकारली, कारण त्यांना ती भुमिका वास्तव वाटली. त्यात विठोबाचे काम करणार्या किरण मानेनी त्यांना सातार्याकडच्या भाषेचा ठसका बरोबर सांगितला. आणि स्मिता तळवलकर यांची जनाबाई अंबिले ही विठोबाची आई झाल्या. सध्या आपण हॉस्पिटलमधील बाळ हरवलं, कुणी पळ्वलं, चोरील गेलं. अशा बातम्या वाचतो. आपल्याल त्यात काही वाटत नाही पण ज्यांचं बाळ चोरील जातं त्यांची काय परिस्थिती होत असेल याचं दर्शन प्रल्हाद जाधव यांनी ’कुणी गोविंद घ्या’ या नाटकात घडवले आहे. हलक्या फुलक्या विनोदाच्या अंगाने. चंद्रभागा (अनिता दाते) सरकारी दवाखान्यात बाळंत होते.जनाबाई (स्मिता तळवलकर) तिची सासू अतिशय खुशीत असते कारण तब्बल बारा वर्षाने तिच्या सुनेला मूल झालेले असतं. त्यामुळं सर्व कुटुंब आनंदात असतं. सासू बाळाला पाळण्यात बघायला जाते तर बाळ गायब असते. त्यांची पाचावर वारण बसते. नर्सला व वॉर्डबॉयला सांगितल्यावर ते म्हणतात होतं असं कधी कधी. सापडेल तुमचं बाळ, मागच्या वेळी असचं बाळ हरवलं होतं ते कचर्याच्या पेटीत सापडलं. वॉर्डबॉय बाळ शोधावयाला जातो आणि एक बाळ घेऊन येतो. म्हणतो कचर्याच्या पेटीत सापडलं हे बाळ. चंद्रभागा मुलाची आजी आणि वडील विठोबा त्याला घेऊन घरी येतात. आई मुलाला पाहते तेव्हा तिच्या लक्षात येते बाळाच्या मांडीवरच्या तिळाची जागाच बदलेली आहे. आणि वजनही जास्त आहे. पण जनाबाई तिला गप्प करते. काही वेळाने हॉस्पिटलमधील डॉक्टर परदेशी (हेमंत भालेकर) डी.एन.ए. तपासून एक बाळ घेऊन येतात. आणि सांगतात की हे बाळ तुमचचं आहे. तुम्ही घेऊन आलात ते तुमचं नाही. बाळ चोरीला गेल्याची केस मागे घ्या. त्या अगोदर विकास पंडित हा एक बाळ चोरीचा तपास करणारा पत्रकार घरी घेऊन जातो व सांगतो की हे बाळ तुमचं नाही. वॉर्डबॉय ही एक मुलं घेऊन येतो. ती मुलगी असते. अशा रीतीने चार बाळं घरात येतात. त्यांची नाव अनुक्रमे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता अशी ठेवली जातात. दिग्दर्शक मंगेश कदम यांनी प्रयोग ठाकठीक बसवला असून पात्रांकडून विषयाला योग्य अशी कामगिरी करुन घेतली आहे. मात्र हॉस्पिटल आणि पोलीस स्टेशनमधील टाईल्सची एकच असलेली भिंत खटकली. दिग्दर्शक मंगेश कदम यांनी नाटक हलकेफुलके आहे हे लक्षात घेऊन केलेले दिग्दर्शक यथार्थ आहे. विठोबाची भूमिका किरण माने यांनी सातारा बोलीत यथार्थपणे केली आहे. स्मिता तळवलकर यांनी सातारी बोलीच्या लहेजाचा वापर योग्यपणे करून ती भुमिका ठसक्यात केली आहे. अनित दाते या ललित कला नाट्य केंद्रांच्या पदवीधर मुलीने आपल्या मिळालेल्या शिक्षणाचा उपयोग या नाटकात योग्य तर्हेने केला आहे. हेमंत भालेकर यांनी डॉक्टर यथार्थपणे उभा केला आहे. वॉर्डबॉयच्या भुमिकेत प्रकाश पेटकर हॉस्पिटलमधून वरून आणलेल्या वॉर्डबॉयसारखे वाटतात. मोहन साटम, नंदु सांवत, श्वेता तिरोडकर यांच्या भुमिका झाल्या आहेत. अशोक पत्की यांचं संगीत प्रसंगानुरूप आहे. सागरिका प्रकाशित महाराष्ट्र रंगभूमी निर्मित संतोष कोचरेकर यांनी सादर केलेले हे नाटक त्याचा विषय गंभीर असला तरी भरपूर करमणूक करणार आहे.
‘इ.एम.आय म्युझिक’ची श्री गणेशाच्या चरणी भावपूर्ण स्वरांजली ‘स्वरगणेश’ श्री गणेशा चरणी अर्पण करण्यासाठी ‘इ.एम.आय’ म्युझिक कंपनीने निर्मिती केलेल्या ‘स्वरगणेश’ ध्वनीफितीचा प्रकाशन सोहळा प्रभादेवीच्या ‘रविंद्र नाट्य मंदिर’मध्ये संपन्न झाला. याप्रसंगी ‘इ.एम.आय’चे टी. सुरेश, संगीत दिग्दर्शक केदार पंडित, कवीश्रेष्ठ प्रवीण दवणे, सुप्रसिध्द गायक शंकर महादेवन, साधना सरगम, पं. संजीव अभ्यंकर, देवकीपंडीत, राहुल देशपांडे आणि शौनक अभिषेकी हे प्रतिभावंत कलाकार उपस्थित होते. ‘साकारू स्वर गणेशु’ या नृत्याने सुरुवात झालेल्या ‘स्वर गणेश’च्या प्रकाशन सोहळ्याची रंगत वरील गायकांच्या सुरेल गीतांनी उत्तरोत्तर वाढत गेली. यावेळी उपस्थित सर्व गायकांनी प्रविण दवणे व केदार पंडित यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. ‘स्वर गणेश’ ध्वनीफितीचे वैशिष्ट्य म्हणजे यात नविन काव्यरचना आणि शास्त्रीय संगीताचा सुरेख संगम झालेला अनुभवता येणार आहे. यातील प्रत्येक गीते ऎकताना श्री गणेशाप्रती श्रध्देची वेगळी अनुभूती श्रोत्यांना घडेल अशा पध्दतीने स्वरबध्द्करण्यात आले आहे.‘स्वर गणेश’ ध्वनीफितीमध्ये श्रवणीय भक्ती गीतांसोबत सुप्रसिध्द गायकांचा आवाजातील साग्रसंगीत पारंपारिक पुजा, गणपती व इतर देवी-देवतांच्या आरत्या, मंत्र पुष्पांजली यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यामुळे श्रोत्यांचा आनंद नक्कीच द्विगुणीत होणार आहे. कवीश्रेष्ठ प्रविण दवणे यांनी लिहिलेली ‘स्वर गणेश’ मधील सर्व आठ सुरेख गीतं हरहुन्नरी संगीत दिग्दर्शक केदार पंडित यांनी संगीतातील विविध रागांचा आणि तालाचा वापर करून संगीतबध्द केली आहेत. ‘ईश गजानन करीती नर्तन’ या गीतामध्ये कथ्थक मधील मुद्राचा तराण्यांचा, काव्याचा अनोखा मिलाप केदार पंडित यांनी साधला आहे. युवा पिढीच्या आवडत्या गायकांच्या आवाजातील ‘स्वर गणेश’ मधील प्रत्येक गीते श्रोत्यांना तल्लीन करायला लावणारे आहे. यातील पारंपारिक पुजा व मंत्र पुष्पांजली आदरणीय पुरोहित श्री. मंदार खळदकर यांच्या आवाजात स्वरबध्द केली आहेत. गणेशाच्या वेगवेगळ्या नावातील अध्यात्मिक तत्वांचे सांगितीक विवेचन करणार्या ‘स्वर गणेश’ ध्वनीफितीमध्ये गणेशासंबंधी (उदा.गणेशाच्या पायाजवळील उंदीर, हातातील मोदक) प्रत्येक गोष्टी मागील तपशील सांगण्यात आला आहे. श्रध्दा आणि भक्तीचे विविध रंग या ध्वनीफितीमध्ये ऎकवटलेले पाहायला मिळणार असून लोकप्रिय गायकांच्या आवाजातील ही ध्वनीफित प्रत्येक गणेश भक्ताने संग्रही ठेवावी अशीच आहे.
मुंबईच्या चौपाटीवरून~ गुन्हेगारांनाच ‘हिरो’ करण्याची स्पर्धा प्रसार माध्यामात सुरु आहे!
“गणरायांच्या तयारीसाठी आपले शेकडो कार्यकर्ते चोवीस तास काम करीत आहेत ही बातमी छायाचित्रासह आपण सगळ्या वर्तमानपत्राकडे पाठविली होति. पण कुणीच आपली बातमी छापलीच नाहीये,”लालबागचा गणेश मंडळाच्या परिसरात बसलेले वृध्द हातातील वर्तमानपत्र पाहात शेजारी बसलेल्यांस सांगत होते,“ पण सगळ्याच वर्तमानपत्रांनी त्या कसाबची बातमी ठळक अक्षरात छापली आहे. आपल्या जागृत राजाची कुणीच दखल घेतलेली नाहीये.” “काका, अहो आजकाल टी व्ही वर सगळ्याच चॅनलवर ‘ब्रेकिंग न्यूज’ कसाबचीच असते,” तळहातावरील तंबाखूला चुना लावताना दुसरे वृध्द सांगत होते. “वर्तमानपत्रांना टी व्ही शी स्पर्धा करावी लागते आणि म्हणून तेही फक्त कसाबच्या ‘गुन्हा कबूल’ला प्रसिध्दी देतात.” “मामा, फक्त कसाबलाच नाही तर कुठही बलात्कार झालेला असला तरी त्यालाच प्रसिध्दी देत असतात,” आपली विडी पेटवित तिसरे वृध्द सांगत होते, “आमच्या शेजारच्या विनू छापलीस? तर तो म्हणाला मी ती पहिल्याच पानावर टाकली होती. पण ऎनवेळी एका बागेतील सामूहीक बलात्काराची बातमी आली आणि राजाची बातमीही जागा बलात्काराने घेतली होती.” “अण्णा सांगताहेत ते अगदी खरं आहे,” खांद्यावर शबनम पिशवी घेऊन आलेला विनू सांगत होत, “काल मी रात्र पाळीलाच होतो. संपादकांना मी सांगितलं की लालबागच्या जागृत राजाची ही बातमी आहे. पण संपादक म्हणालेत की आज दिवसभर दुरदर्शनच्या सर्वच चॅनलवर सामूहीक बलात्काराची बातमी दाखविण्याचीच स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आपण टिकलं पाहिजे आणि म्हणून या बलात्कारात राजकीय पक्षाचा एक कार्यकर्ताही होता हे आपल्यालाच कळलेले असल्यामुळे तीच बातमी पहिल्या पानावर आली पाहिजे. “अरे विनू, टी व्ही चॅनलवाले दिवस रात्र कसाबची कोर्टातील हिरोगिरी सांगतात आणि तेवढ्यानीच त्यांचं समाधान होत नसल्यामुळे कसाबने बोरीबंदरात कसा केला हेहि दाखवित असले तरी लोक पाहाता नि वसरून जातात,” आपल्या हातातील वर्तमानपत्र दाखवित काका सांगत होते, “पण तुमच्या वर्तमानपत्रात तुम्ही जे छापता ते सत्य लोकासमोर कायम राहात असल्यामुळे कसाबला दररोज हिरो करणार्या आणि बलात्कासारख्या विघातक बातम्या प्रसिध्द करणं, समाजहितासाठी तुम्ही तरी थांबवलचं पाहिजे.” “त्याचं काय आहे काका” आपल्या खांद्यावरिल पिशवितून आणखी तीन वर्तमानपत्र काढून ती दाखवित विनू सांगत होता, “आमच्या वर्तमानपत्रात कसाबची आणि बलात्काराची बातमी एका कॉलमपुरतीच मर्यादित आहे. पण या दोन वर्तमानपत्रात याच दोन्ही बातम्या चार कॉलमात छापलेल्या आहेत. आणि या वृतपत्रांनी पुन्हा बदुंकधारी कसाबचं नि बलात्कारासाठी अटक करण्यात आलेल्यांची छायाचित्रेही प्रसिध्द केलेली आहेत.” “अरे विनू, वृत्तपत्रांना तुम्ही लोकशाहीचाच एक आधारस्तंभ म्हणता. मग तुम्ही तरी गुन्हेगारांनाच ‘हिरो’ बनविण्याच्या या टी व्ही चॅनलच्या स्पर्धेत सहभागी व्हायला नको,“ मळलेला तंबाखू तोंडात टाकताना मामा सांगत होते. टी व्ही वर पाहिलेले लोक लगेच विसरून जातात.” “तसं नाहीये मामा,“ वर्तमानपत्रे आपल्या पिशवीत ठेवताना विनू सांगत होता, “टी व्ही चेच मोठे आव्हान सध्या लोकशाहीचाच एक आधारस्तंभ असलेल्या वृत्तपत्रांसमोर आहे. अनेक वृत्तपत्रे त्यामुळेच बंदही झालेली आहेत. गुन्हेगारांना हिरो करण्याची ही स्पर्धा समाजविघातक आहे याची जाणीव वृत्तपत्रांना असते. पण अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होत असल्यामुळे दिवसभर सर्व चॅनलस काय दाखवित आहेत याकडे लक्ष ठेऊनच प्रसार माध्यमांच्या या स्पर्धेत वृत्तपत्रांनाही नाईलाजाने उतरावे लागते.” “आपल्या राजालाच प्रार्थना करु या,” विझलेली विडी पुन्हा पेटवित अण्णा सांगत होते.“ की गुन्हेगाराला हिरो करणार्या या प्रसार माध्यामांना तूच सुबुद्धी दे.” - Source - नवसंदेश |